Thursday, 9 July 2015

मैत्री म्हणजे काय?

मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम


मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास

मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे

मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं

मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे

मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव

आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी

मनोमेघ

हा पाऊस आणि तुझी आठवण

हा पाऊस आणि तुझी आठवण
 दोन्ही आडवता येत नाही 
पण त्याना आडवायचं
 का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही.
~ चंद्रशेखर गोखले 

Tuesday, 7 July 2015

सरीवर सर ....

सरीवर सर ....

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

संदीप खरे

Thursday, 2 July 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Wednesday, 1 July 2015

पून्हा पावसाचे दिवस...

पून्हा पावसाचे दिवस अन पून्हा तुझं तसच
वागणं....
खिडकी लाऊन घेताना तिरप्या नजरेनं
बघणं ....
-चंद्रशेखर गोखले

| बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल |

" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||


" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

Tuesday, 30 June 2015

तुझी आठवण येताना


"तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण

कानांमध्ये दाटुन येते,

मी मिटुन घेतो डोळे तेव्हा

तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे

वास्तवाचे भान सुटुन जाते,

मनात तुझ्या आठवांचे

पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते..,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा... देउन जाते....."

' या आईला काही कळतच नाही...'



' या आईला काही कळतच नाही...'

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही


दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...

Being a mother is one of the highest paid jobs in the world since the payment is PURE LOVE . You must appreciate..............

जुने फोटो

जुने फोटो

किती छान वाटते
जुने फोटो बघायला .
मलाही आवडते
स्वताला फोटोत
बंद करून घ्यायला


कधीही बघा
वय कसे तेच असते
ह्या सरत्या वयातही
आपले जुने वय
आपल्यालाच
नव्याने भेटत असते

मी बघत बसतो
बालपणीचे फोटो
ती खिडकी तशीच
नि
आभाळात ढग
अजूनही बरसत नसतो
वाटत रहाते
उघड्या दारातून

आई कधीपण येईल
अभ्यास झाला का म्हणून
नुसतेच डोळ्याने विचारीन
कधी कधी
फोटो बघताना

ती दिसून जाते
आणि तिची आठवण
शप्पत
ओली ओली होऊन येते
जुने फोटो बघताना

माझे असेच होऊन जाते
वर्तमान काळ हरवून जातो
अन
मन फुलपाखरू होऊन
झुलून जाते

प्रकाश

Thursday, 25 June 2015

रूप सदाफुलीचे

रूप सदाफुलीचे पाहुनी थेंब पावसाचे भूलले,
पाकळ्यांना हळुवार स्पर्श करीत न्याहाळत ते बरसले,
थेंबांच्या त्या गार स्पर्शाने रोमांच सदाफुलीच्या अंगी उठले,
मोत्यांच्या क्षणिक सहवासात रूप सदाफुलीचे अधिकच खुलले.

Wednesday, 24 June 2015

वयाचे दाखले द्यायला
आपण पावसाळे मोजतो
पण खरं सांगा त्यात आपण
कितिसे भिजतो?
~ चंद्रशेखर गोखले

गोष्ट वेड्या पावसाची

गोष्ट वेड्या पावसाची

नाही राजा-राणीची
नाही मांजर-मनीची
ऐका सांगते तुम्हा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

मेघांतून एकटाच आपुला
पाऊस रोज फिरत असे
कुणीच नाही खेळायला
हेच त्याचं दुःख असे

पळावया हे अथांग आकाश
पण पकडायला कुणीच नसे
गगनाच्या या अफाट जगात
जो तो आपुला मग्न असे

अशाच एका सायंकाळी
ठरविले त्या पावसाने
अंबरी नाही कुणीच सोबती
जाईन म्हणतो धरतीकडे

अंगावर काळा कोट घालून
ऐटीत तो तयार झाला
ढगांच्या रथात स्वार होऊन
दौडत दौडत पृथ्वीवर निघाला

पृथ्वीवर आगमन होताच त्याने
नद्या-सागरांना मिठी मारली
शेतात पिकांबरोबर डोलताना
हास्याची गोड कळी खुलली

फुले हसली, पाने डोलली
निर्झर खळखळून धावू लागले
या डोंगरावरून त्या डोंगरावर
पावसाचे खेळ सुरूच राहिले

असा हा खुळा पाऊस
मनसोक्त खेळून गेला
जाता जाता धरतीचेही
मन तृप्त करून गेला

अशीच झाली होती मैत्री
या पावसाची धरतीशी
कशी वाटली सांगा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

~सुप्रिया गावडे, डोंबिवली

Tuesday, 23 June 2015

विचार लाटा

विचार लाटा 
-डॉ रामदास गावली

Monday, 22 June 2015

सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ खोटी करणं.

सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ खोटी करणं.





!!एक दिवसाचा पांडुरंग ....

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"

(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.

पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"

तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.


शाळा.. आणि पावसाळा..

शाळा.. आणि पावसाळा..
दोघ आसपास एकत्रच शुरु व्हायचे..
नविन रेनकोट, रंगित छत्रि घेउन शाळेत जाताना कितिहि हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..

रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा.. गमबूटचा उपयोग चालण्यासाठि कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठि जास्त व्हायचा..
लहानपणीची शाळा पावसाळा खुप छान होतं..
आता सगळे मोठे झाले, पैशाच्या पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे...

भिजून गेला वारा...

भिजून गेला वारा...

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा

झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा

स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा

Sunday, 21 June 2015

पहिल्या अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पहिल्या अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
राजपथ आज योगपथ झाले .


Friday, 19 June 2015

मन आणि आभाळ

मनाचं आणि आभाळच
काहीतरी नातं असावं !
नाहीतर आभाळ भरून आल्यावर
मनही का दाटून यावं ?
-शरद

चहा…! की Daru…!!

मला हे comparison आवडले.
चहा…! की Daru…!!

चहा म्हणजे उत्साह..,
Daru म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
Daru म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
Daru अक्षरशः निवांत...!

चहा म्हणजे झकास..,
Daru म्हणजे वाह मस्त...!!

चहा म्हणजे कथासंग्रह...,
Daru म्हणजे कादंबरी...!

चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
Daru एक धुंद संध्याकाळी...!!

चहा चिंब भिजल्यावर...,
Daru ढग दाटुन आल्यावर...!

चहा = discussion..,
Daru = conversation...!!

चहा = living room....,
Daru = waiting room...!

चहा म्हणजे उस्फूर्तता...,
Daru म्हणजे उत्कटता...!!

चहा = धडपडीचे दिवस...
Daru = धडधडीचे दिवस!...!

चहा वर्तमानात दमल्यावर...,
Daru भूतकाळात रमल्यावर...!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
Daru पिताना स्वप्न रंगवायची...!!!

Thursday, 18 June 2015

तुझ्या माझ्यातलं नातं

तुझ्या माझ्यातलं नातं
जसा आभाळाचा श्वास 
कधी रणरणतं ऊन 
तर कधी हलक्या सरींचा भास …   

Wednesday, 17 June 2015

धूसर धुके

ओंझळीत पहाडांच्या
धूसर धुके साठलेले …
गुफेत हृदयाच्या
जणू दुः ख दाटलेले …

Tuesday, 16 June 2015

Monday, 15 June 2015

तिला डोळे भरुन पाहु द्या मला.

एवढ्यात तिरडी उचलु नका थोडं अजुन हसु द्या मला
लगेच चिता पेटवु नका थोडं अजुन जगु द्या मला
ती येईलच इतक्यात जरा एकटयाला पडु देत मला
माझ्यासाठी तिला रडताना डोळे भरुन पाहु द्या मला..

Sunday, 14 June 2015

आज शाळेचा पहिला दिवस

आज शाळेचा पहिला दिवस असेल
आज कुठे रडू तर कुठे हसू दिसेल
पण शाळेचा तो पहिला दिवस
आज हि आठवणीत कुठेतरी कोपरा करून बसेल...
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी

Friday, 12 June 2015

१२ जून. पु.लं.चा स्मृतिदिन

१२ जून. पु.लं.चा स्मृतिदिन. ज्या व्यक्तिरेखा काळाच्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाहीत त्या अमर आहेत. पु.लं.च्या स्मृती त्यांच्या बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने अमर आहेत.
त्यांच्या स्मृतिला अभिवादन!


Thursday, 11 June 2015

भास…‎मंगेश पाडगावकर

भास…‎मंगेश पाडगावकर

Wednesday, 10 June 2015

....नाही तर तुमचे आय़ुष्य शुन्य होईल

लग्नाची ही पहिली दोन-तिन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात
हातात हात घालून गप्पा मारायचे असतात,नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.
पण हे ही दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडन-फिरण होत, खरेदी होते
मग हळूच चाहुल लागते बाळाची
आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो
सर्व लक्ष आता बाळावर केन्द्रित होते
त्याच खाण-पिण, उठ-बस, शी-शु
त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...वेळ कसा फटाफट निघून जातो
एव्हाना तिचा हाथ नकळत त्याच्या हातून सूटलेला सतो, गप्पा मारन, हिंडन-फिरण केंव्हाच बंद झालेले असत, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.
अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.
बाळ मोठ होत जात..ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.
घराचा हप्ता,गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.
तो पूर्ण पणे स्व:तला कामात झोकुन देतो.
बाळाचे शाळेत admission होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.
एव्हाना पस्तिशी आलेली आसते,
स्व:तच घर असत, गाडी असते.
बैंकेत बर्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी ही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते
आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला ' एकच प्याला ' सुरु करतो
दिवासामागुन दिवस जात असतात ; मूल मोठ होत असत, त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..
त्याचीही दहावी येते आणि जाते
तो पर्यन्त दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.
एका निवांत क्षणी,त्याला मग ते जुने दिवस आठवतात
वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठ तरी फिरायला जावू...
ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते ' कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला ; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत '
कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..
मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा सोडू लागलेले असतात...मूल आता college मध्ये असत.. बैंकेत शून्य वाढत असतात...तिन आपल नाव भजनी मंडळात मध्ये घातलेल असत... आणि ह्याचे वीकेंड चे ' एकच प्याला ' चे कार्यक्रम सुरुच असतात...
मूल college मधून बाहेर पडत...आपल्या पायावर उभ राहत, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जात..
आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...तिलाही चश्मा लागलेला असतो. आता "तो" तिला म्हातारी म्हणु लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो..
पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते... बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसत..एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...
औषध-गोळ्या यांच्या वेळ वार ठरलेले असतात...डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात...मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असत..
आता मूल कधीतरी परत येतील ही वाट बघन तेवढच काय ते हातात असत...
आणि तो एक दिवस येतो..संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...तो लगबगीने जावून फोन घेतो, समोरुन मुलगा बोलत असतो..मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी काय करायच ते विचारतो... आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हातार्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते...तो म्हातार्याला एक सल्ला देतो ' एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला दया आणि तुम्हीही तिथेच रहा ' पुढच थोडस जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.
म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो, म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते
" तो " तिला हाक मारतो ' अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू '
म्हातारी चक्क म्हणते ' हो आलेच '
म्हातार्याला विश्वासच वाटत नाही, आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो
तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातल तेज कमी कमी होत जात...आणि ते निस्तेज होतात...
म्हातारी आपल आटपुन म्हातार्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय.. पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हातार्याला हात लावते..शरीर थंड गार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात
क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय कराव हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते...
हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.
म्हातार्याचा थंडगार हात घेते आणि म्हणते ' चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...'
अस म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, एकटक नजरेन ती म्हातार्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.
आणि म्हातारीची मान अलगद म्हातार्याच्या खांद्यावर पड़ते.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो....
त्यासाठी नुसते शुन्यच जमा करत बसु नका मुलासाठी. नाही तर तुमचे आय़ुष्य शुन्य होईल.
हे ज्याने लिहले आहे खरच खुप छान त्याला मा झा सलाम.
Dedicate to all office workers.......
Pls share it...

यश ...

#MarathiKavitaBlog
यश ...

तुझ्या कुशीत येताना

तुझ्या कुशीत येताना
माझ्या श्वासात वादळं उठतात
या वादळांना भिऊनच
माझे डोळे अलगद मिटतात
- चंद्रशेखर गोखले

तो अन् ती...

तो अन् ती...
‪#‎LoveStory‬
ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?
तो: permission काय घेतेस...
विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?
तो: आहे कोणीतरी ...
जी माझी असून हि माझी नाही...
ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......
हम्म्म्म.....राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग...
पण फुकट पकावू नकोस ..
तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून फक्त मलाच पाहणारी ....
ती: (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती????
तो: (तिच्याकडे पाहत हसतो, अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि, तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग हरवून बसेन मी तुला,
कारण तुझ्या शिवाय आता मला जगणं जमत नाही....
काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातल गुपित आपोआप उलगडतं,
तो काहीही न बोलता, ती सगळ बोलते,
मैत्रीच्या नात्याला, प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात,
कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

Tuesday, 2 June 2015

Friday, 29 May 2015

काच

काच
माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस

परिस्थितीच्या काचेवर
एकाबाजूने मी हात ठेवताच
दुसऱ्याबाजूने तू
बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास
पाणीदार डोळ्यातून
किती बोलली होतीस
तेव्हाच एक धागा विणला गेलेला
त्या काचेच्याही आरपार
.
कीतीदातरी
प्रत्यक्ष आणि फोनवरही
निशब्दातच..
बोललीस माझ्याजवळ
तेव्हा
त्याच नात्यामुळे
त्याच धाग्यामुळे
सहज पोहोचलीस खोल मनात
तुला कळतच असेल, हो ना?
~ तुष्की (तुषार जोशी)

हे दिवस निघून जातील..

हे दिवस निघून जातील..

Tuesday, 26 May 2015

मौन

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

– मुक्तायन, कुसुमाग्रज

Friday, 22 May 2015

एक सत्य घटना..सुधा मुर्तीं

एक सत्य घटना..
ही गोष्ट आहे १९७४ ची. तेव्हा बेंगलोर शहरात IISc. मधे
सुधा कुलकर्णी नावाची विद्यार्थीनी शिकत होती.
ती एकदा हॉस्टेलवरुन लेक्चर हॉल कडे जात असताना नोटीस बोर्ड
वर एक जाहीरात पाहीली. ती जाहीरात होती प्रसिद्ध
टेलको (आताची टाटा मोटर्स) . ती खालील प्रमाणे होती.
'The company required young, bright engineers, hardworking
and with an excellent academic background, etc. At
the bottom was a small line: ‘Lady Candidates need not
apply.’
त्या शेवटच्या ओळीने सुधाची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने
सरळ टेलकोच्या मुख्य प्रबंधकाला पत्र लिहून जाब विचारायचे
ठरविले. पण त्या वेळी त्यांचे नाव माहीत नसल्याने तिने सरळ
टाटा ग्रुप्सचे प्रमुख जे.आर. डी. टाटा यांना पत्र लिहले आणि ती ते
विसरुन गेली.
१० दिवसात तिच्या पत्राला उत्तर आले. तिला टेलको पुणे ईथे
ईंटरव्हूसाठी बोलावले होते त्यासाठी लागणारा सर्व खर्च
टेलको कंपनी करणार होती. ईंटरव्हूसाठी सहा पॅनलिस्ट होते. सुधाने
एंट्री केल्याबरोबर त्यांच्यात 'हीच ती जे.आर.डीं. ना पत्र
लिहणारी वगैरे कमेंट झाले. सुधा हुशार असल्याने तिला तो ईंटरव्हू
फारसा जड गेला नाही. ईंटरव्हू झाल्यावर
त्या सहाजणांपैकी एकजण म्हणाला. 'त्या जाहिरातीत तसे
लिहण्याचे कारण म्हणजे ही जॉब शॉप फ्लोर ची आहे.
मुली सहसा तिथे काम करत नाहीत मग एव्हढा ईंटरव्हू घेउन
फायदा होत नाही पण तुम्ही स्वतः ईंट्रेस्ट दाखविल्या बद्दल
धन्यवाद. तुम्ही शॉप फ्लोरवर काम करणा-या पहील्या महिला आहात.
काही दिवस असे गेले तोच एक दिवस जे.आर.डी. टेलको पुणे ला भेट
द्यायला आले. त्यावेळी टेलकोचे मुख्य प्रबंधक सुमंत मुळगावकर होते.
सुमंत मुळगावकरांनी सुधाची ओळख शॉप फ्लोरवरची पहिली महिला अभियंता अशी करुन दिली. त्यांनी सुधाचे हस्तांदोलन केले. आता मात्र सुधाला भिती वाटत होता न करो सुमंत सर किंवा जे.आर.डीं नी पत्राचा विषय
काढला तर पण तिच्या सुदैवाने दोघेही ती गोष्ट विसरले होते. सर्व
पाहणी करुन निघण्यास त्यांना रात्रीचे ९ वाजले. तेव्हा पार्कींग
लॉट मधे नव-याची वाट पाहत असलेली सुधा दिसली.
जे.आर.डींनी विचारल्यावर तिने कारण सांगितले. तेव्हा ते म्हणाले.
' रात्र खुप झालीय आणि अशा वेळी एका स्त्रीने असे एकटे उभारणे
ठिक नाही. मी तुमच्या सोबतीला उभारतो तुमचे मिस्टर येईपर्यंत. '
आता मात्र सुधाला मनात कालवा-कालव जाणवू लागली.
ईतका मोठा माणूस आपल्याबरोबर शुल्लक वाट बघत उभा आहे.
ईतक्यात सुधाचे मिस्टर आले. सुधाने त्यांची आणि जे.आर.डीं ची ओळख करुन दिली. 'हे माझे मिस्टर नारायण मुर्ती आणि हे.. ' पुढे सुधाजी काही बोलणार एव्हढ्यात नारायण मुर्तींचा चेहरा 'अजि म्या ब्रह्म पाहिले ' असा झाला होता. जे.आर.डी. हस्तांदोलन करताना मुर्तींना म्हणाले. 'मिस्टर मुर्ती कितीही मोठे झालात तरी आपल्या बायकोला अशी वाट बघायला लावू नका ' ईतके बोलून ते निघून गेले.
पुढे जेव्हा सुधा मुर्तींनी नोकरीचा राजिनामा दिला तेव्हा सुमंत सरांनी तो सरळ जे.आर.डीं कडे पाठविला. तेव्हा जे.आर.डी. स्वत: सुधा मुर्तींना फोन करुन राजिनाम्याचे कारण विचारले.
तेव्हा सुधाजी म्हणाल्या ' माझ्या मिस्टरांनी ईन्फोसिस नावाची स्वतंत्र कंपनी काढली आहे तेव्हा त्यांच्या मदतीसाठी मला जाणे भाग आहे.
तेव्हा जे.आर.डीं.नी प्रतिप्रश्न केला, 'तुम्ही यशस्वी झाल्यावर काय करणार?'
तेव्हा सुधाजी म्हणाल्या.' काही ठरविले नाही. आम्हाला तर हो ही माहीत नाही की आम्ही यशस्वी होऊ का नाही...' मधेच वाक्य तोडत जे.आर.डी गरजले 'शट अप ! असले रडगाणे गाऊ नका. नवीन सुरवात करताय तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. ऑल दी बेस्ट!
आणि हो अयशस्वी होऊन माझ्या कंपनीत तुम्ही परत दिसता कामा नये.'
त्यांनी रिसीव्हर खाडकन ठेवला.
पण ते शेवटचे शब्द सुधाताईंच्या मनात शेवटपर्यंत घुमत राहीले
धन्य ते जेआरडी आणि धंन्य त्या सुधाताई !
आपल्यात त्यांच्यातले एक टक्का गुण जरी आले तरी आपण यशस्वी उद्योजक होऊ !

Wednesday, 20 May 2015

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

– आरती प्रभू

एकांत माझा

एकांत माझा

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.

दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

– सुरेश भट

Tuesday, 19 May 2015

पैठणी

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची, अनओळखीची जाणीव गूढ आहे त्यास

धूप कपूर उदाबात्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले एक तन एक मन
खास-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली

वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात काल पटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा!

-शांता शेळके

Monday, 18 May 2015

दुखः प्रेमातल्या विरहाचं

दुखः प्रेमातल्या विरहाचं
आज तिलाही कळाल होतं
म्हणूच मिठीत मला तिने
आज स्वतः मध्ये लपवला होतं
~ सुधीर जगताप

स्पर्श ...

तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा 
तुझे नवे स्पर्श विसावतात 
आणि संयमाची घट्टवीण 
ते माझ्या नकळत उसवतात 
~चंद्रशेखर गोखले